– बळीराजा आर्थिक चक्रव्युव्हच्या गर्तेत
झरी : युवराज निखाडे
यावर्षी पावसाने कहर केल्याने हातात आलेले पीक नष्ट झाले असून आता बोंडअळीचाही पिकावर प्रकोप झाला आहे. या बोंडअळीमुळे आता शेतकरी पुन्हा आर्थिक चक्रव्यूव्हाच्या संकटात सापडला आहे.
यावर्षी पावसाळा लागताच सुरुवातीपासूनच पावसाने कहर केला. जेमतेम सोयाबीन निघायला सुरुवात झाली होती. परंतु ऐन सोयाबीन निघायच्या वेळी पावसाने कहर केला. परिणामी हातात आलेले पीक नष्ट झाले. दरवर्षी दसऱ्यापासूनच कापूस निघायला सुरुवात होते. परंतु यावर्षी अतिवृष्टी झाल्याने फुटलेला कापूस हा लोंबकळलेल्या अवस्थेत होता. यातही थोड्याफार प्रमाणात कापूस निघायला सुरुवात झाली आहे, तर आता कापसाची बोंडे फुटण्याअगोदरच बोंडामध्येच बोंडअळी असून बरेचशी बोंडे सडली आहेत. ज्या कापसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी कर्ज करून घेतले आहे. त्या कर्जाची परतफेड होणार की नाही, या संकटात आता शेतकरी सापडला आहे.

कापूस फुटण्याअगोदरच बोंड अळीच्या प्रकोपामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. मुकुटबन परिसर हा कापसाचा बेल्ट असून या परिसरात उच्च दर्जाचा कापूस पिकल्या जातो. त्यामुळे या कापसाच्या भरवशावर शेतकरी आपला वर्षभराचा खर्च निघेल की नाही, या विवंचनेच्या गर्तेत सापडला आहे.