– अनेक कामात गौडबंगाल असल्याचा आरोप
– मनसे चा आंदोलनाचा ईशारा
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यात 15 व्या वित्त आयोगाचा शासनाकरवी आलेला लाखो रुपयांच्या निधीचा थातुरमातुर उपयोग करून जनतेची दिशाभूल व बोळवण करीत कंत्राटदार व प्रशासनाने आर्थिक मलिंदा लाटल्याचा आरोप करीत तालुक्यातील कामे पारदर्शक तपासणीसाठी तात्काळ समिती गठीत करून दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा गर्भीत ईशारा निवेदनातून देण्यात आला.
मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामांकरिता शासनाच्या विविध योजनेंतर्गत निधी उपलब्ध करण्यात येवून यात 15 वित्त आयोग योजनेतील कामात थातुरमातुर कामे करवून निधीचा अपव्यय करण्यात आल्याचे भयावह चित्र तालुक्यात आहे.अनेक कामे दर्जाहीन करीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.त्यामुळे पदाधिकारी व प्रशासकीय कर्मचारी बाबत साशंकता निर्माण होत अनेक ग्रामपंचायत मधील परस्पर उचल संशयाच्या भोवऱ्यात सापडली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
तालुक्यात झालेल्या कामांची, जमाखर्चाची व देयकांची सखोल चौकशीसाठी तात्काळ समिती गठीत करून दोषीवर कडक शासन करावे अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन छेडून वठणीवर आणेल अशा आशयाचे निवेदन स्थानिक ते जिल्हापातळीवर जिल्हाउपाध्यक्ष संतोष रोगे यांनी दिले आहे.