– कामकाज प्रभावित : नगराध्यक्षाचे जिल्हाधिकारी यांचेकडे साकडे
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
15 हजार लोकवस्तीच गजबलेलं मारेगाव. विकास कामावर लक्ष केंद्रीत करणारे लोकप्रतिनिधी लोकांभिमुख कामावर अक्षरशः वैतागले आहे. गत काही दिवसापासून नगरपंचायतच्या जम्बो इमारतीत प्रशासकीय कॅप्टनचं नसल्याने ही इमारत विकास कामासाठी अधिकाऱ्याविना वांझोटी ठरत आहे. किंबहुना शहरातील विकास कामांना खिळ बसत असल्याने थेट नगराध्यक्षांनी जिल्हास्थळी निवेदनाने साकडे घातले आहे.

येथील नगरपंचायत प्रशासनाचा काही दिवसापासून सुस्त कारभार चव्हाट्यावर आला आहे. प्रशासकीय अधिकारी, मुख्याधिकारी बाबर यांचे स्थालांतर होवून महिन्याभराचा कालावधी लोटला मात्र त्यांची खुर्ची रिकामी आणि कॅबिन कुलूपबंद असल्याने शहरातील कामकाज पूर्णतः ठप्प पडले आहे. यामुळे शहर विकासकामासाठी प्रभावित झाले आहे.

विशेष म्हणजे स्थापत्य व विद्युत अभियंता यांचा अतिरिक्त कारभार मारेगाव करिता आठवड्यातून निवडक दिवसासाठी देण्यात आला मात्र मारेगाव ची अँलर्जी असल्याने हे महाशय अधिकारी अद्यापावेतो रुजू झाले नसल्याचे वास्तव आहे.त्यामुळे येथील नागरिकांच्या मूलभूत गरजांना अधिकाऱ्यांकडून सोयीस्कर ठेंगा दाखविण्यात येत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

परिणामी, विकास कामांना अधिकाऱ्याविना बाधा निर्माण झाल्याने मारेगावात तात्काळ कायमस्वरूपी मुख्य पदाची पदभरती करण्यात यावी अशा आशयाचे साकडे नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून साकडे घातले आहे. यावर कधी अंमल होतोय याकडे मारेगावकरांचे नजरा खिळल्या आहे.


