तालुका आरोग्य प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
रक्त नमुना अहवालाला लागतोय आठवडा
मारेगाव : कैलास ठेंगणे
तालुक्यातील 56 ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या 105 गावांमध्ये डेंगूसदृश्य आजाराने चांगलाच कहर माजविला आहे. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची प्रचंड गर्दी होत असताना रुग्णांच्या रक्ताचे नमुना अहवाल मिळण्याकरिता आठ दिवसाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे रुग्णावर निदान व उपचार करताना डॉक्टरांना मोठी कसरत करावी लागते. तर दुसरीकडे रुग्ण गंभीर होऊन मृत्यूच्या दाढेत ओढल्या जात आहे . एवढा सारा गंभीर प्रकाराकडे तालुका आरोग्य प्रशासनाने लक्ष द्यावे अशी रुग्णांची मागणी जोर धरत आहे.
तालुक्यातील 105 गावांमध्ये सध्या वायरल फीवर सह डेंगूसदृश्य आजाराने चांगले डोके वर काढले आहे. प्रत्येक घरोघरी तापाने रुग्ण फणफणत आहे. त्यामुळे खाजगी दवाखाने हाऊसफुल झाले आहे. तर त्याचबरोबर शासकीय रुग्णालयातील रुग्णाची मोठी गर्दी होत असतांना कुंभा येथील रहिवाशी व सध्या बाभई पोळ नजीकचे शिवारात राहणाऱ्या अठरा वर्षीय युवकाचा डेंगूसदृश्य आजाराने सेवाग्राम ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला.
तालुक्यातील प्रत्येक गावात तापाचे रुग्ण आढळत असताना आरोग्य विभागाची फिरते पथक मात्र दिसेनासे असे झाले आहे. हे पथक कुठल्या रुग्णाची तपासणी करत आहे हे न उलगडणारे सर्वसामान्य जनतेला कोडे ठरू पाहत आहे. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी या सर्व गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
धुरफवारणीकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
तालुक्यातील प्रत्येक गावात देऊन सदृश्य आजाराने थैमान घातले आहे. डासाचा गावागावात मोठा प्रादुर्भाव झाल्याने रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तालुक्यातील ५६ ग्रामपंचायत पैकी २५ ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून लाखो रुपये खर्च करून फॉगिंग मशीन विकत घेतले आहे. तरीही फक्त वीस ग्रामपंचायतीने आतापर्यंत धूर फवारणी केल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर येत आहे. उर्वरित इतर ग्रामपंचायती कधी धूर फवारणी करणार असा प्रश्न नागरिक विचारत आहे. तर दुसरीकडे गटविकास अधिकारी या सर्व गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
खासगी डॉक्टरांची दसऱ्या पूर्वीच दिवाळी
तालुक्यात व्हायरल फिवर मोठ्या प्रमाणात आहे.प्रत्येक घरात रुग्ण अशा आजाराचे भयाण वास्तव आहे.शासकीय रुग्णालयात मलेरिया , टायफाईड , डेंगू आदी तपासणीचा बागुलबुवा आहे.आजार सदृश्य तपासणीचा रिपोर्टला आठवडा लागतो आहे.त्यामुळे रुग्णांची अवस्था खिळखिळी झाली आहे.त्यामुळे अनेकांनी खासगी रुग्णालयाचा आसरा घेतला आहे.खासगी दवाखाना व पॅथालॉजीच्या वाढत्या दराने सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक ससेहोलपट होत असतांना जम्बो रुग्णामुळे खासगी डॉक्टरांचे चांगलेच फावत आहे.त्यांची दसरा येण्यापूर्वीच दिवाळी होत असल्याचे उपरोधीतपणे बोलल्या जात आहे.